Friday, June 28, 2013

`खेळ’खंडोबा


बॉलिवूड, क्रिकेट आणि राजकारण हे भारतीयांचे तीन प्रमुख जीवाभावाचे विषय आहेत. या तीन गोष्टींभोवती आपले सार्वजनिक आयुष्य घुटमळत असते. परंतु दुदैवाने या तीनही क्षेत्रात सावळागोंधळ माजला आहे. ज्याच्या हातात ससा आहे तीच मंडळी आपणच पारधी असल्याचा आव आणून आपापली कुरणे राखत आहेत. बॉलिवूडमध्ये कलात्मकता आणि मनोरंजनाच्या गोंडस नावाखाली बीभत्स नंगानाच सुरू असून राजकारण ही एक शिवी बनली आहे. टाळ्या पिटण्यासाठी एकत्र आलेल्या दोन्ही हाताचे क्षणातच वंदन करण्याची धमक आणि कुवत कोणत्याच राजकीय नेत्यांमध्ये उरली नाही. क्रिकेटसाठी वेडा झालेला भारतीय क्रिकेटमधील सावळ्यागोंधळामुळे पुरता नाऊमेद झाला आहे. प्रतिस्पर्ध्याकडून झालेली हार पाहताना जितके दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक दुःख व्यवस्थापनाकडून होत असलेल्या गलिच्छ कारभारामुळे होते. व्यवस्थापनात बोकाळलेला भ्रष्टाचार, राजकारणी मंडळींचा वाढता हस्तक्षेप, सिनियर खेळाडूंची दादागिरी आणि भविष्याकडे कानाडोळा करण्याची प्रवृत्ती यामुळे कुत्रे पिठ खात असतानाही आंधळ्यांना ते दिसत नाही. भारतीय नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी निवड समिती प्रमुख मोहिंदर अमरनाथ यांनी नागपूर कसोटी सामन्याआधीच बॉम्ब टाकला आहे. परदेशात तब्बल सलग आठ वेळा भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागल्याने `ऑस्ट्रेलिया वॉशआऊट’नंतर महेंद्रसिंग धोनीची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात यावी असा निर्णय निवड समितीतील पाचही सदस्यांनी घेतला होता. मात्र बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी निवड समितीच्या कारभारात हस्तक्षेप करून धोनीलाच कायम ठेवण्याचा एकखांबी निर्णय घेतला, असा आरोप अमरनाथ यांनी केला आहे. कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदी विरेंद्र सेहवाग तर एक दिवसीय सामन्यांसाठी गौतम गंभीरची निवड करण्यात यावी अशी मागणी नियामक मंडळ करीत होते. परंतु धोनीला हात लावायला बीसीसीआय तयार नाही. कर्णधार निवडण्याचा अधिकार जर एकच व्यक्ती घेणार असेल तर निवड समिती का नेमायची असा सवालही अमरनाथ यांनी केला आहे. यापूर्वी अमरनाथ यांनीच निवड समितीचे सदस्य `जोकर’ असल्याची टीका केली होती. तेच अमरनाथ नंतर निवड समितीचे प्रमुख बनले होते. यापूर्वी कपिल देव, राहुल द्रविड, सुनील गावस्कर, यशपाल शर्मा, सौरव गांगुली या माजी खेळाडूंनी बीसीसीआयचे जाहीर वस्त्रहरण केलेले आहे. परंतु पालथ्या घडय़ावर पाणी ! कोणत्याही खेळाडूने चमकदार खेळी करून चाहत्यांची वाहवा मिळविली आणि तो जाहिरातदारांच्या गळ्यातील ताईत बनला तर त्याला हात लावण्याची हिम्मत बीसीसीआयला होत नाही. तोच खेळाडू वयोमानानुसार सुमार खेळू लागला तरीही त्याला `बस’ म्हणून सांगण्याची हिम्मत कुणामध्ये नाही. स्वतःच्या मालकीची जहागीर असल्यासारखा तो खेळाडू उदयोन्मुख खेळाडूंची जागा अडवून बसतो. करोडो रुपयांची उलाढाल असलेल्या या खेळात पैशालाच अधिक महत्व आल्यामुळे या पैशाच्या आवाजात अनेकांचा आवाज दबला जातो. नुकसान होते ते भारतीय क्रिकेटचेच. ज्या ठिकाणी पैशांचा वास येतो त्या ठिकाणी राजकारणी कसे पोहचतात हेच कळत नाही. आयुष्यात कधीही बॅट हातात न धरलेली मंडळी क्रिकेटचे व्यवस्थापन करतात. त्यामुळे अशी मंडळी आपापले हितसंबंध जपू लागतात. मग सचिन वा धोनीला जाब विचारण्यासाठी त्यांच्या पाठीला कणा राहात नाही. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सची धुरा धोनी वाहतो. हा संघ श्रीनिवास यांच्या मालकीचा आहे. सचिन आणि मुकेश अंबानीचे घट्ट संबंध आहेत. त्यामुळे या खेळाडूंना कधीच न दुखविण्याकडे संबंधितांचा कल असतो. देशाचे, क्रिकेटचे कुणाला काही पडले नाही. अमरनाथनंतर अन्य कुणी पुन्हा टीका केली तर त्यालाही `आपलेसे’ करण्याची खुबी नियामक मंडळ आणि `मांडवली’मध्ये आहे. त्यामुळे अशी टीका केवळ एक बातमी किंवा चर्चेचे रवंथ करण्यासाठी मिळालेला विषय बनून राहते. खरे तर भारतीयांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. आपण बदलाला सामोरे जाण्यास नेहमीच कचरतो. दुसरा सचिन होणे नाही, दुसरी लता मंगेशकर होणे नाही, पुन्हा अमिताभ बच्चनसारखा नट होणार नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, बाळासाहेब ठाकरेंसारखा कुणी होणे नाही, अशी नकारात्मक भूमिकाच आपल्या अंगवळणी पडली आहे. दुसरा सचिन, लता वगैरे होणार नसले तरी त्यांच्यापेक्षा आणखी कर्तबगार, आणखी प्रभावी कुणीतरी भविष्यात होऊ शकतो हे मानायला आपले मन तयार होत नाही. परिवर्तन हा सृष्टीचा निसर्गदत्त नियम आहे. व्यक्तीपूजा करणे सोडून वास्तवाला सामोरे जाण्यातच मानवजातीचे भले आहे. भूतकाळाने पाठ फिरविल्यानंतर भविष्याला सामोरे जायचे असते. त्यादृष्टीने भारतीय क्रिकेटकडे पहायला हवे. आपला संघ कायम जगज्जेता कसा राहील यासाठी आताच प्रयत्न करायला हवेत. सचिन आणखी दहा वर्षे खेळू शकतो. त्या दहा वर्षात तो एखादे शतकही ठोकेल, धोनीही आणखी सात-आठ पराभव पत्करून एखादी कसोटी जिंकून देऊ शकेल, नाही असे नाही. पण तोपर्यंत क्रिकेटचा खेळखंडोबा होईल त्याचे काय?
- भगवान निळे

No comments:

Post a Comment