Friday, June 28, 2013

शरीरापलिकडची गोष्ट


डोंबिवलीत मुलीची छेड काढल्यावरून मदतीला गेलेल्या एका तरुणाची हत्या झाल्याचे प्रकरण घडताच महिलांचे मोठय़ा प्रमाणावर लैंगिक शोषण होत असल्याची ओरड पुन्हा एकदा सुरू झाली आहे. आणखी काही काळ अन्य कोणता प्रश्न उद्भवत नाही तोपर्यंत या प्रश्नावर वेगवेगळ्या चर्चा होऊन तात्पुरता तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होतील. महिला व बाल कल्याणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही लैंगिक शोषण, आणि छेडछेडीचा गुन्हा हा अजामीनपात्र गुन्हा ठरविण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला आहे. शिक्षा वाढविल्याने गुन्हे कमी होतात असा भाबडा आशावाद मंत्रीमहोदयांना वाटत असावा. उल्हासनगरातील ंिरंकु पाटील प्रकरण किंवा मरिन लाईन्सवरील पोलिस चौकीत कॉन्स्टेबलने केलेला बलात्कार या गाजलेल्या प्रकरणानंतरही महिलांचे लैंगिक शोषण, छेडछाड, टोमणे मारणे आदी प्रकार कमी झालेले नाहीत. उलट त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. जाणीवपूर्वक शारीरिक लगड करून मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्यास कलम 354 अन्वये गुन्हा सिध्द झाल्यास दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा, दंड अथवा दोन्ही अशी कायद्यात तरतूद आहे. तसेच, महिलांवर शेरेबाजी करणे, शिटी वाजविणे या आरोपाखाली कलम 509 अन्वये एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि दंड अथवा दोन्ही अशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे. किती महिलांना आणि मुलींना किंबहुना मुलांनाही या कायद्याची माहिती आहे? घर, आणि समाजाची भीती, कुटूंबाला कलंक लागेल, उगीचच ताप नको, पोलिस आणि कोर्टाच्या फेर्या कोण मारणार? असा सारासार विचार करून मुली आपल्यावरील छेडछाडीची प्रकरणे पोलिसांकडे घेऊन जात नाहीत. महिलांचे लैंगिक शोषण आणि विनयभंगाच्या प्रकरणात देशात महाराष्ट्र राज्य दुसर्या क्रमांकावर आहे. वर्षभरात महाराष्ट्रात लैंगिक शोषण आणि विनयभंगाचे 8436 तसेच, महिला अत्याचाराचे 2 लाख 13 हजार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. असे का होते याचा सखोल विचार व्हायला हवा. सामाजिक तसेच, मानसिक दृष्टीकोनातून या समस्येकडे पाहण्याची गरज आहे. समाजात अशाप्रकारची विकृती का जन्म घेते याचाही विचार व्हायला हवा. देवीची पूजा करणार्या आपल्या देशात महिलांच्या इभ्रतीचे खुलेआम धिंडवडे का काढले जातात याचा आपण कधी विचार केला आहे का? समाजातील ही विकृती नष्ट करण्यासाठी मानसिकता बदलायला हवी. केवळ कायदे करून ही मानसिकता बदलणार नाही. त्यासाठी प्रबोधनाची जशी गरज आहे तशीच बालवयातच शास्त्रोक्त पध्दतीचे लैंगिक शिक्षण देण्याची आज खरी गरज आहे. `संभोग’ ही नैसर्गिक क्रिया म्हणजे मोठे गुपित आहे, ही एक अदभूत गोष्ट असून त्याची जाहीर वाच्यता करू नये, ते पाप आहे, शरीरधर्म ही वाईट गोष्ट आहे, `लग्न’ म्हणजे समाजाने संभोगाला दिलेली कायदेशीर परवानगी आहे असेच लहानपणापासून आपल्यावर बिंबविण्यात येते. त्यामुळेच स्त्रीस्पर्श अथवा भिन्नलिंगी आकर्षणाबाबत आपण साशंक असतो. याबाबत पालक,बहिण -भाऊ अथवा शिक्षकांकडे कुतूहल समजून घेण्याची सोय नाही. समवयस्क मित्र-मैत्रिणींशी बोलून मुले – मुले आपली समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. अथवा घाणेरडी पुस्तके किंवा इंटरनेटवरील आक्षेपार्ह संकेतस्थळे, ब्ल्यू फिल्म यामधून माहिती मिळविण्याचा शॉर्टकट पण चुकीचा मार्ग अबलंबितात. यातून निर्माण होते ती केवळ विकृती. या सामाजिक विकृतीवर तोडगा काढण्याची गरज आहे. परंतु असे करताना पुन्हा आपली संस्कृती, रिती-रिवाज, रुढी-परंपरा, धार्मिक अधिष्ठान आडवे येते. मानवी शरीराची नेमकी ओळख आपल्याला झालेली नसते. भिन्नलिंगी शरीराबाबत सगळय़ांनाच नेहमीच सुप्त आकर्षण असते. शारीरिक गरजेपोटी परस्पर प्रेमाचा ओलावा निर्माण होऊन आकर्षण, ओढ निर्माण होते. या प्रेमापासून, स्पर्शापासून, सुखापासून, अनुभवापासून जी मुले वंचित राहतात ती मग `हे सुख’ मिळविण्यासाठी मनातच झुरत असतात किंवा मुलींशी लगट करून, त्यांना धक्के मारून, टोमणे, शिटय़ा मारून, चोरटा स्पर्श करून आपली `गरज’ भागवित असतात. रेल्वे, बस, गार्डनमधील बाकडे, पिकनिक स्थळांवरील झाडे, भिंती, सार्वजनिक शौचालये या ठिकाणी गलिच्छ मजकूर लिहून आपल्या मनात कोंदटलेल्या, दबलेल्या, गुंठीत झालेल्या इच्छेला वाट मोकळी करून देतात. बहुतांश मुली `जस्ट फेन्ड’ अथवा `मानलेला भाऊ’ या नावाखाली आपली पुरूष स्पर्शाची हौस भागवून घेतात, हे कुणी मान्य करायला तयार नसले तरी नागडे वास्तव आहे. कोणत्याही महिलांचे लैंगिकच नव्हे तर कसल्याही प्रकारचे शोषण होणार नाही अशा स्वरूपाची समाजरचना हवी. त्यासाठी या बाबींचा नीटपणे, समजूतदारपणे, भावना बाजूला ठेवून, खुल्या दिलाने विचार व्हायला हवा. कारण, समाजाची ही मानसिकताच जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत कितीही कायदे करून, किंवा शिक्षा वाढवून काहीही साध्य होणार नाही. वरवरची मलमपट्टी करण्यापेक्षा रोगाचा समूळ नायनाट करण्यासाठी पाऊले उचलायला हवीत. शरीराच्या पलिकडे निर्भेळ प्रेम नावाची गोष्ट असते आणि तीच जीवनाचा खरा आनंद देते, हे सगळ्यांना कळेल तोच सुदिन!

No comments:

Post a Comment